पद्मश्री चैतराम पवार यांच्या हस्ते डॉ. कैलास निखाडे यांच्या पुस्तकाचं भव्य प्रकाशन



भामरागड (प्रतिनिधी):

राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने शैक्षणिक क्षेत्रात एक नवा मैलाचा दगड उभा केला आहे. विभागप्रमुख आणि निसर्ग अभ्यासक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कैलास वि. निखाडे यांच्या “पाणी व्यवस्थापन” या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच विदर्भ पाणी परिषदेमध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. चैतराम पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार रचलेले हे पुस्तक जलसंपत्तीच्या शाश्वत वापरावर आणि पारंपरिक तसेच आधुनिक पद्धतींच्या प्रभावी एकत्रीकरणावर प्रकाश टाकते. "पाणी अडवा, पाणी जिरवा" या संदेशाला आधार मानून पुस्तकात स्थानिक भूप्रदेश, कृषिसंस्कृती, भूजल पुनर्भरण आणि जलनीतीचे व्यवहार्य पैलू अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहेत.

शैक्षणिक परिषदेचे मान्यवर उपस्थित

पुस्तक प्रकाशन सोहळ्याला शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधवी खोडे-चवरे, प्रकुलगुरु डॉ. सुभाष कोंडावार, राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, संयोजन समितीतील डॉ. विजय इलोरकर, श्री. सुमंत पुणतांबेकर, सौ. शुभांगी नक्षिणे-उंबरकर, श्री. राज मदनकर, श्री. सोपानदेव पिसे आणि सामाजिक कार्यकर्ते मा. वामनराव तुर्के यांच्यासारख्या मान्यवरांनी आपल्या उपस्थितीने सोहळ्याचे वैभव वाढवले.

ग्रामीण भागात शैक्षणिक योगदानाचा ठसा

भूप्रदेश, जलस्त्रोत आणि पर्यावरण संवर्धन यावर दीर्घकाळ संशोधन करणारे डॉ. निखाडे यांचे हे पुस्तक केवळ शैक्षणिकच नव्हे, तर ग्रामीण भागातील जलनीती राबविणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शक ठरणार आहे. या उपक्रमातून केवळ एक पुस्तक नव्हे, तर स्थानिकतेला स्पर्श करणारे ज्ञानाचे स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वीरीत्या झाला आहे. हा शैक्षणिक प्रकाशन सोहळा केवळ गौरवाचा क्षण नव्हता, तर भविष्यातील अभ्यासकांसाठी प्रेरणादायी पाठदेखील ठरला.





Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment