झाडांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ

राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात पर्यावरण रक्षणासाठी झाडांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा


भामरागड, २० ऑगस्ट २०२४: राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय, भामरागड येथील भूगोल विभागाच्या वतीने पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने अनोखा रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून त्यांच्या संरक्षणाची शपथ घेतली, आणि "झाडे जगवा, झाडे लावा" हा संदेश दिला.

कार्यक्रमाचे नेतृत्व भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. कैलास व्हि. निखाडे यांनी केले. त्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले आणि प्रत्येकाने झाडांचे संवर्धन करण्यासाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक डॉ. प्रमोद घोनमोडे यांनी अध्यक्षीय भाषणात पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सांगितल्या, ज्यात विद्यार्थ्यांचा सहभाग अधिकाधिक वाढविण्यावर भर दिला.

प्रमुख पाहुणे म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संतोष सं. डाखरे यांनी उपस्थितांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाच्या कार्यात सहभागी होण्याचे आणि निसर्गाशी नाते घट्ट करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रा. मोरानडे यांनी झाडांच्या संवर्धनासाठी उपयुक्त उपाययोजनांवर प्रकाश टाकला, तर प्रा. विशाल तायडे यांनी झाडांच्या फायदे स्पष्ट करून त्यांच्या संरक्षणाची आवश्यकता अधोरेखित केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. बंडू बोन्डे यांनी महत्त्वपूर्ण मदत केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक नवा दृष्टिकोन निर्माण झाला असून, स्थानिक समाजातही या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढली असून, भविष्यात अशा प्रकारच्या उपक्रमांची अधिक गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे निसर्गाशी नाते अधिक घट्ट होत असून, त्यांच्या जीवनात पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.

Share this:

CONVERSATION

1 comments: